काही कथा


काही कथा


नेटवर वाचलेल्या काही प्रेरणा देणारया , नितिकथा तुमच्यासाठी !





इसिडॉर इस्साक राबी हा पदार्थवैज्ञानिक व नोबेलविजे पारितोषिकवीजेता  त्याच्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सच्या शोधाबद्दल प्रसिद्ध आहे. 

तो म्हणत असे, 'माझ्या आईने तसा काही हेतू नसताना मला शास्त्रज्ञ बनवलं. जेव्हा ब्रुकलिनमधली प्रत्येक ज्यू माता तिच्या मुलाला शाळा सुटल्यावर विचारत असे- 'आज काही शिकलास का?'

तेव्हा माझी आई विचारत असे, 'इझी, तू आज काही चांगला प्रश्न विचारलास का?' 

या एक चांगला प्रश्न विचारण्याच्या फरकामुळे मी शास्त्रज्ञ बनलो.'













एकदा एका साधकाने गुरूला विचारले की, 'चांगल्या लोकांना वाईट गोष्टी का सतावतात?' 

तेव्हा गुरूंनी उत्तर दिले की, 'मुळात तुझा प्रश्न असा असायला हवा, की जेव्हा चांगल्या लोकांना वाईट गोष्टी सतावतात, तेव्हा त्यांचं काय होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे- ते अधिक चांगले लोक बनतात. 

कारण सर्वसाधारण लोक अशा परिस्थितीत स्वत:ला एक प्रश्न विचारतात,

'मीच का?







चीनमध्ये एक तरुण निष्णात धनुर्धर होता. आपल्या कौशल्याचा त्याला अभिमान होता. एकदा तो राजाला म्हणाला , ' मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे असे तुम्ही जाहीर करा , मला आव्हान देण्याची कुणाची इच्छा असेल तर ते मी स्वीकारण्यासाठी तयार आहे. ' 

राजा प्रगल्भ होता. तो हसला आणि म्हणाला , ' बाजूच्या जंगलात तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ असा धनुर्धर आहे. तू त्याला भेट नंतर आपण ही घोषणा करू. कारण तो ही घोषणा एकून इथे येणार नाही. जो श्रेष्ठ असतो तो कधीच कुणाशी स्पर्धा करीत नाही. इर्षा ही नेहमी कनिष्ठांच्याच मनात असते. '


तरुण धनुर्धर उत्सुकतेनी त्या निर्मनुष्य जंगलात गेला. खूप आत एका झोपडीजवळ एक वृद्ध त्याला काम करताना दिसला. तरुणाने त्याला विचारले , ' आपण धनुर्धर आहात का ?' तो उत्तरला , ' मी कधीकधी धनुष्य चालवत असतो , पण मी धनुर्धर आहे का हे मात्र लोक ठरवतील. ' तरुणाच्या विनंतीवरून त्या वृद्धाने आपली धनुष्यकला दाखवली आणि तरुण चकितच झाला. कारण वृद्धाच्या तुलनेत तरुणाला काहीच येत नव्हते. तीन वर्ष तो तरुण वृद्ध धनुर्धराकडे अभ्यासासाठी थांबला. आता तोही त्या विद्येत चांगलाच पारंगत झाला. आपल्याला सगळे काही येते असे त्याला वाटू लागले.


एक दिवस गुरू लाकडांची मोळी घेवून येत असताना तरुणाने त्यांच्यावर बाण चालवला. अतिशय चपळाईने वृद्ध गुरूने मोळीतील एक लाकूड फेकून मारले आणि बाण उलटा जाऊन तरुणाच्या छातीत घुसला. वृद्धाने तरुणाच्या छातीतून बाण काढताना सांगितले. ' हा एक डाव मी तुला शिकवला नव्हता. कारण मला तुझ्या मनातली इर्षा ठाऊक होती. एक दिवस सर्वश्रेष्ठ होण्यासाठी तू मलाही मारशील हे मला माहीत होते. पण तू घाबरू नकोस. मला मेलेलाच समज. कारण मी कधीही कुणाशीच स्पर्धा करीत नाही. मला माहीत आहे माझ्या गुरूच्या तुलनेत मला काहीच येत नाही. माझ्यापेक्षाही निष्णात असणारे माझे गुरू बाजूच्या हजार फूट उंच डोंगरावर एकटेच राहतात.


तरुण खजिल झाला होता पण अधिक उत्सुकतेनी तो डोंगरावरच्या या महागुरुला भेटायला निघाला. उंच कड्यावर खोल दरीच्या अगदी काठावर हे महागुरू एका पायावर तोल सांभाळून उभे होते. तरुण त्यांना दुरूनच म्हणाला , मी धनुर्धर आहे. 

महागुरू म्हणाले , ' अरे मग धनुष्यबाण कशाला बाळगतोस ? ते तर शिकण्याचे साधन आहे. एकदा का तू निष्णात झाला की धनुर्धर तर तुझ्या आत हवा. आत्म्यात भिनलेला. अजूनही तू धनुष्यबाण बाळगतो म्हणजे तू बच्चा आहेस. ये तू माझ्याजवळ ये. मी तुला निष्णात करीन. खोल दरीच्या काठावर येण्यास तरुणाचे मन धजावले नाही. तरुण म्हणाला , ' मी अजून जवळ येवू शकत नाही. भीतीने माझ्या मनाचा थरकाप उडत आहे. '


महागुरू हसले आणि म्हणाले , ' ज्याचे मनच स्थिर नाही त्याचा निशाणा कसा अचूक लागणार. ' तेवढ्यात त्यांनी डोक्यावरून जाणाऱ्या पक्ष्यांच्या रांगेकडे हाताने निशाणा केला आणि सारे पक्षी जमिनीवर येवून कोसळले. अवाक झालेला तरुण परतला आणि राजाला म्हणाला , ' मला कुणाशीच स्पर्धा करायची नाही. मी सर्वश्रेष्ठ तर सोडा साधा धनुर्धर म्हणावयाच्याही लायकीचा नाही. ' मनातले द्वंद्व ज्याला जिंकता येते तो खरा जेता.







एका मुलाला त्याच्या आजोबांनी एक रोप दिले. ते लावण्यासाठी कुंडी, माती सारे आणले. त्यात ते रोप लावले. ' आता तू याला रोज पाणी घालायचं. म्हणजे काही दिवसांनी त्याची मुळं मातीत चांगली रुजतील. मग त्याला छान फळं, फुलं येतील. ' आजोबांनी समजावून सांगितले. त्यानंतर ते अधूनमधून चौकशी करायचे. ' अरे, नियमितपणे पाणी घालतोस ना? ' असे विचारायचे. ' होय तर ' नातू म्हणायचा. असेच काही दिवस गेले. एके दिवशी नातवाने तक्रार केली की, ' मी रोज न चुकता पाणी घालतो. शिवाय त्याची पाहणी करतो, तरीही ते वाढत नाही. उलट वाळत चाललंय.


आजोबांना आश्चर्य वाटले. ते स्वत: पाहायला गेले, तर झाड खरंच वाळलेलं दिसलं. कुंडीतली माती विस्कळीत झालेली दिसली. त्यांनी हात लावून पाहिले तर ते मुळासकट हातात आले. ' ' अरे याची मुळंच वाढलेली नाहीत तर झाड कसं वाढणार? '

' तेच तर म्हणतोय मी, ' नातू म्हणाला, ' ती मुळं वाढतच नव्हती. मी बघत होतो की रोज उपटून किती वाढलीत ते. ' हे बोल ऐकून आजोबा हतबुद्ध होऊन गेले. तरीही स्वत:ला सावरत म्हणाले,

' अरे, मुळं काही अशी एका दिवसात नाहीत रुजत. ही मुळं म्हणजे झाडाचा पाया आहे. तो आधी घट्ट रुजावा लागतो. तेव्हा त्याच्यावर झाड भक्कमपणे उभं राहू शकतं. '







एका पहाडी धर्मशाळेत एक पाळलेला पोपट होता. त्याच्या मालकानं त्याला जे बोलायला शिकविलं होतं, ते न समजता तो पोपट रात्रंदिवस त्याचा पुनरुच्चार करीत असे. तो सारखा म्हणत असे, ' स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता! '

एक यात्री त्या धर्मशाळेत प्रथमच उतरला होता. त्या पोपटाच्या सारख्या आक्रोशाने त्याला अत्यंत दु:ख झाले; कारण मायदेशाच्या स्वातंत्रलढ्यामध्ये त्याने अनेकवेळा तुरुंगवास भोगला होता. पोपटाच्या स्वातंत्र्याच्या गजरामुळे त्यालाही आपल्या तुरुंगवासाच्या दिवसांची आठवण झाली. त्या यात्रेकरूने त्या पोपटाला मुक्त करायचा निश्चय केला व रात्री मालकाची नजर चुकवून त्याच्या पिंजऱ्याचे दार उघडून दिले. परंतु तो पोपट बाहेर येईना. यात्री पोपटाला पिंजऱ्याबाहेर खेचू लागला, पण पोपट पिंजऱ्याची सळई घट्ट धरून बसून राहिला. अखेरीस कसेतरी त्या पोपटाला बाहेर काढून आकाशात सोडून दिल्यावर तो निश्चिंत झाला व समाधानाने झोपी गेला.

परंतु सकाळी उठून पाहतो, तो पोपट त्याच्या पिंजऱ्यात आनंदाने जाऊन बसला होता आणि मिरची खात ओरडत होता,

' स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता! '






एक जोडपे असते . एकमेकांवर नितांत प्रेम करणारे , पण निर्धन . त्यांना सदैव पैशांची अडचण असते . मुलगा उत्तम व्हायोलिन वादक असतो ; परंतु त्यावर त्यांची गुजराण होत नाही . या मुलीला आपल्या नवऱ्याच्या व्हायोलिनवादनाचा खूप अभिमान असतो . तिला सारखे वाटत असते की त्याच्या व्हायोलिनसाठी एक सुंदर पेटी बनवून घ्यायला हवी ; ज्यामुळे त्याचे वाद्य खराब होणार नाही . तिने त्यासाठी एक सुंदर पेटी पाहून ठेवलेली असते .

मुलीचे केस फार सुंदर असतात . अगदी सोनेरी आणि लांबसडक . मुलाला नेहमी वाटायचे की आपल्या प्रियेने अशा सुंदर केसांची वेणी घलण्यापेक्षा त्याला एक छानशी पीन लावावी आणि केस मोकळे सोडावेत . एका जवाहिऱ्याच्या दुकानात त्याने तिच्यासाठी एक पीन पाहूनही ठेवलेली असते . त्या पिनेसाठी पैसे कसे गोळा करावेत , याचाच विचार तो करीत असतो .

करता करता त्यांच्या लग्नाचा वाढदिवस येतो . दोघेही ठरवतात , एकमेकांना आश्चर्यचकित करायचे . त्या दिवशी सकाळी दोघेही खूप लवकर उठून घराबाहेर पडतात आणि दिवस मध्यान्हीवर आल्यावर घरी परततात . मुलगा म्हणतो , ' मी तुझ्यासाठी जे स्वप्न पाहिले , ती स्वप्नपूर्ती मी आज केली आहे ,' असे म्हणून तो तिच्यासाठी आणलेली सुंदर रत्नजडित पीन तिच्यासामारे धरतो . तिचे डोळे विस्फारतात . तिचे हात अजून मागेच असतात . ते पुढे घेऊन ती तिच्या नवऱ्याला व्हायोलिनसाठी तिने आणलेली पेटी दाखविते . तो आनंदाने चित्कारतो .

तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की ही पेटी बनविण्यासाठी त्या मुलीने आपले सुंदर केस कापून विकलेले असतात आणि तिच्या नवऱ्याने ती पीन विकत घेण्यासाठी आपले व्हायोलिन विकून टाकलेले असते . दोघेही भावनावश होऊन एकमेकांना मिठी मारतात .

तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की ही पेटी बनविण्यासाठी त्या मुलीने आपले सुंदर केस कापून विकलेले असतात आणि तिच्या नवऱ्याने ती पीन विकत घेण्यासाठी आपले व्हायोलिन विकून टाकलेले असते . दोघेही भावनावश होऊन एकमेकांना मिठी मारतात .







एकदा शुकदेव राजा जनकाकडे येतात. म्हणतात , ' तुला सगळेजण संन्यासी राजा किंवा श्रीमंत योगी असे म्हणतात. तू तर राजमहालात राहतोस. सगळी सुखे उपभोगतोस. तू कसा योगी ?' त्यावर जनक राजा शुकदेवांना विनम्रपणे म्हणतात , ' तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी थोड्या वेळानंतर देतो. तत्पूर्वी आपण माझा महाल पाहावा अशी माझी इच्छा आहे. परंतु तो पाहताना मी आपल्या हातात तेलाने भरलेला एक दिवा देणार आहे. तो घेऊन आपण महालभर फिरावे. मात्र त्या दिव्यातील एक थेंबही तेल खाली सांडू नये याची दक्षता घ्या , एवढी विनंती मी आपणांस करीत आहे. '

जनकाने सांगितल्यानुसार शुकदेव महाराज दिवा घेऊन निघाले. संपूर्ण महाल पाहून परत आले. दिव्यातील तेल जराही सांडलेले नव्हते. परत आल्यावर शुकदेव महाराज स्थानापन्न झाले. जनकाने त्यांना विचारले , ' महाराज , माझ्या महालात आपल्याला काय काय दिसले ? ऐश्वर्याच्या किती खुणा सापडल्या ?' त्यावर शुकदेव महाराज म्हणाले , ' मला तर महालात काहीच आढळले नाही ; कारण माझे लक्ष सतत दिव्यावर व त्यातून सांडणाऱ्या तेलावर होते. ' जनक हसून त्यांना म्हणाले , ' महाराज , माझेही तसेच आहे. हे ऐश्वर्य उपभोगण्याची सवडच मला नाही ; कारण जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र मला लक्ष ठेवावे लागते. ' शुकदेव महाराजांनी जनकाचे श्रीमंत योगीपण मान्य केले.

जनकाने सांगितल्यानुसार शुकदेव महाराज दिवा घेऊन निघाले. संपूर्ण महाल पाहून परत आले. दिव्यातील तेल जराही सांडलेले नव्हते. परत आल्यावर शुकदेव महाराज स्थानापन्न झाले. जनकाने त्यांना विचारले , ' महाराज , माझ्या महालात आपल्याला काय काय दिसले ? ऐश्वर्याच्या किती खुणा सापडल्या ?' त्यावर शुकदेव महाराज म्हणाले , ' मला तर महालात काहीच आढळले नाही ; कारण माझे लक्ष सतत दिव्यावर व त्यातून सांडणाऱ्या तेलावर होते. ' 

जनक हसून त्यांना म्हणाले , ' महाराज , माझेही तसेच आहे. हे ऐश्वर्य उपभोगण्याची सवडच मला नाही ; कारण जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र मला लक्ष ठेवावे लागते. ' शुकदेव महाराजांनी जनकाचे श्रीमंत योगीपण मान्य केले. 










शुकबहात्तरीमध्ये एक कथा आहे . शालिपुरातील गुणाकार नावाच्या तरुण व्यापाऱ्याची पत्नी श्रियादेवी दुसऱ्या एका तरुण व्यापाऱ्यावर अनुरूक्त होती . एकदा ती परपुरुषाच्या शय्येवर असताना तिच्या सासऱ्याने व्यभिचाराचा पुरावा म्हणून तिच्या पायातील नुपूर काढून घेतले . हे तिच्या ध्यानी येताच तिने त्या परपुरुषाला पाठवून दिले आणि पतीच्या शय्येवर येऊन त्याला जागे करून सासऱ्याविरुद्ध तक्रार केली . 



सासऱ्याने तिच्यावर पुराव्यासह आरोप करताच ती स्त्री म्हणाली , ' मी तुमच्या पुत्राच्या शय्येवरच शयन केले होते , हे सिद्ध करण्यासाठी मी एक दिव्य करते .' त्या गावाच्या उत्तरेला एक वेताळाचा माळ होता . तेथे वेताळाची भव्य मूर्ती होती . जो खरा असतो तोच त्या वेताळाच्या ढांगांखालून पलीकडे जाऊ शकतो , हे सर्वांना माही त असते . ती स्त्री म्हणाली , ' मी त्या वेताळाच्या ढांगेखालून पलीकडे जाईन .'



दिव्य करण्याचे निश्चित होताच त्या व्यभिचारणीने आपल्या प्रियकराला निरोप पाठविला की , ' तू दिव्य करण्याच्या ठिकाणी वेड्याच्या वेशात ये . मी वेताळाच्या मूर्तीकडे जाऊ लागताच माझ्या गळ्याला मिठी मार .' वेताळाच्या माळावर सर्व गावकरी जमतात . ती स्त्री दिव्य करण्यासाठी शेजारच्या सरोवरात स्नान करते आणि हातात पूजासाहित्य घेऊन दिव्य करण्यासाठी जाऊ लागते . ठरल्याप्रमाणे वेड्याच्या आवतारातील तिचा प्रियकर हातवारे करीत येतो आणि तिला मिठी मारून पळून जातो .


 ती स्त्री लोकांना उद्देशून म्हणते , ' त्या वेड्याच्या स्पर्शाने माझी काया अपवित्र झाली आहे . मी पुन्हा सरोवरात स्नान करते .' स्नान झाल्यावर ती स्त्री वेताळाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी राहते आणि सर्व गावकऱ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलते . ' हे वेताळा , माझा पती आणि माझ्या गळ्यात पडलेला वेडा या दोघांशिवाय कोणाही दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श मला चुकूनही झालेला असेल , तर मला तुझ्या ढांगांखालून जाऊ देऊ नकोस .' असे म्हणून ती वेताळाच्या ढांगांखालून सहजपणे पलीकडे जाते . ते पाहून गावातील सर्व लोकांनी तिचा ' सती ' म्हणून गौरव केला आणि सासऱ्याला दोषी ठरविले . वेताळ तिच्या चातुर्यापुढे थक्क झाला .



आपणही तिच्या बुद्धिचातुर्यावर खुश होतो . एखाद्या सज्जन माणसाने बुद्धिचार्तुयाने आपले निरपराधित्व सिद्ध केले तर आनंद होणे स्वाभाविक आहे . पण चोर , फसवे , ‌ नीतिभ्रष्ट , दुष्ट , पापी लोक बुद्धीचा वापर करून कायद्याच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करून घेतात आणि उजळ माथ्याने समाजात वावरू लागतात तेव्हा संभ्रम निर्माण होतो . असा संभ्रम निर्माण होईल अशीच परिस्थिती आज आहे . अनेक लोक निर्दोष सुटणाऱ्या गुन्हेगाराच्या मागे जाताना , त्याचा उदोउदो करताना दिसतात . खरेतर एखाद्याच्या बुद्धिचातुर्यामुळे चकित न होता आपण सत्याच्या बाजूला उभे राहायला हवे , नाहीतर संत तुकाराम महाराजांनी सांगूनच ठेवले आहे ,



आंधळ्याचे काठी लागले आंधळे। घात एक वेळे मागेपुढे।









महाकवी खलील जिब्रानची एक गोष्ट आहे.

एका गावात दोन विहिरी होत्या. एक प्रजेची , दुसरी राजाची.

एके दिवशी एका चेटकिणीने प्रजेच्या विहिरीत मंत्र टाकून सांगितले की , जो या विहिरीचे पाणी पिईल , तो वेडा होईल. दुसऱ्या दिवशी त्या विहिरीचे पाणी प्यायल्यावर सगळे लोक वेडे झाले आणि राजवाड्यावर चालून गेले. ते सर्व म्हणू लागले , ' आमचा राजा वेडा आहे. त्याने आता पायउतार व्हायलाच हवे. आम्हाला वेडा राजा चालणार नाही. '

राजाला कळेना की अचानक हे झाले कसे ? पण त्याचा प्रधान हुशार होता. त्याने राजाला सांगितले , ' मी प्रजेला थोपवतो. तुम्ही प्रजेच्या विहिरीचे पाणी पिऊन या. ' राजा पळाला. त्याने प्रजेच्या विहिरीचे पाणी प्यायले व तोही नाचत , हातवारे करत राजवाड्याकडे परतला. 

सगळ्या प्रजेने राजाचे हे रूप पाहिले व खुश होऊन सगळे म्हणाले , ' आपला राजा तर चांगला झाला. आता चिंता करण्याचे कारण नाही. ' सगळे समाधानाने आपापल्या घरी गेले. राजा परत आपल्या सिंहासनावर विराजमान झाला... 







चित्रलेखा नावाच्या अभिसारिकेची कथा सर्वश्रुत आहे.

एका मोठ्या धर्मगुरूचे दोन शिष्य तिच्याकडे राहायला येतात. तिच्यासारख्या अभिसारिकेजवळ राहून पाप काय आणि पुण्य काय याचा शोध त्या दोघांनी घ्यायचा , असा धर्मगुरूंचा आदेश असतो. चित्रलेखा श्रुंगाराचे , ऐषआरामाचे आयुष्य जगत असते. परंतु मनाने अत्यंत पवित्र , निरागस असते. याउलट ज्या धर्मगुरूंनी आपल्या शिष्यांना तिच्याकडे पाठविलेले असते , ते चित्रलेखाला भेटतात , तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून त्यांचाच पाय घसरतो , मन ‌विचलित होते. 

शेवटी त्या शिष्यांना हे समजून चुकते की , अमका व्यवसाय केला म्हणून कोणी पापी आहे असे नाही आणि धर्मगुरू झाले म्हणून ते पुण्यवान आहेत असे नाही. पाप-पुण्य आपल्या मनात असते आणि ते आपल्या आचरणात उतरत राहते.


Image Source: images.google.com
Story Source: Facebook, Maharashtratimes.com, Loksatta.com

2 comments:

Thank you for visiting !