काही कथा - भाग 6



काही कथा - भाग 6




एकदा एक गुराखी चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. गुरांना चरण्यासाठी सोडून दिल्यावर एकटाच एका झाडाखाली बसला. वेळ घालवण्यासाठी म्हणून जवळच पडलेल्या एका दगडाने दुसऱ्या दगडावर आघात करू लागला. दोन-तीन आघात झाल्याबरोबर तो दगड तुटला व थोडय़ा अंतरावर जाऊन पडला.

गुराख्याने दुसरा दगड घेतला व आता या दगडावरही तो तसेच आघात करू लागला. या दगडाने मात्र ते सर्व घाव सहन केले व आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या दगडाचे एका सुंदर मूर्तीत रूपांतर झाले. त्या गुराखीने ती मूर्ती तेथेच ठेवली व गुरांना घेऊन निघून गेला.

रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजुरांना जेव्हा ती मूर्ती दिसली तेव्हा त्यांना वाटले की हा तर चमत्कारच झाला. सकाळी तर येथे मूर्ती नव्हती. प्रभूने आपल्यासाठीच ही मूर्ती पाठवली असेल. अवश्य आपणास या मूर्तीसाठी मंदिर बनवावे लागेल, असे म्हणून ग्रामस्थांनी सगळ्यांच्या सहयोगाने तेथे मंदिर बनवून त्यात या मूर्तीची स्थापना केली.


या मूर्तीवर वाहण्यासाठी नारळ फोडायला दगड हवा होता म्हणून एक ग्रामस्थ खाली पडलेला एक दगड उचलतो, तर तो तोच दगड असतो जो त्या गुराख्यांच्या फक्त दोन-तीन प्रहारांनी तुटलेला असतो. त्याला मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवले जाते.

आता रोज त्याच्यावर नारळ फोडले जातात. एकदा कुणीही नसताना त्या मूर्तीने अचानक दरवाजातील दगडाला विचारले,

'काय मित्रा, कसा आहेस?'

तेव्हा उत्तरादाखल दगड म्हणाला, ''काही नको विचारू बाबा. दिवसभर झालेल्या आघातांना तू सहन केलंस, पण आता तुझी पूजा होते आहे, पण मी मात्र एक-दोन आघातांनी घाबरून गेलो. पण आता मात्र रोजच माझ्या शरीरावर आघात होत आहेत. याचा पश्चात्ताप मला आयुष्यभर राहील.''









एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले, ''मी तुम्हाला एका बिकट कामगिरीसाठी जवळच्या प्रदेशात पाठवणार आहे. तेथील लोकांना तुम्ही काही सांगितलं व त्यांनी तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही काय कराल?''

शिष्यांनी उत्तर दिले, ''तथागत, असं झालं तर आम्ही समजू येथील लोक फारच चांगले आहेत. त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही हे खरं. पण उलटून शिव्या तर दिल्या नाहीत?'' 
यावर तथागत म्हणाले, ''ठीक आहे. त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या, काही अपशब्द वापरले तर तुम्ही काय कराल?'' 
शिष्य म्हणाले, ''तरीदेखील आम्ही समजू इथले लोक चांगले आहेत. त्यांनी आम्हाला फक्त शिव्याच दिल्या, मारहाण तर केली नाही.'' 

पुन्हा तथागत म्हणाले, ''पण जर त्यांनी तुम्हाला मारलं तर?'' 
शिष्य म्हणाले, ''आम्ही म्हणू की हे लोक किती चांगले आहेत, कारण यांनी आमचा जीव तर घेतला नाही.'' 

पुन्हा तथागत म्हणाले, ''समजा, त्यांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर?'' 
शिष्य म्हणाले, ''आम्ही असेच समजू की या प्रदेशातील लोक सज्जन आहेत. त्यांनी आम्हाला भगवंताचं काम करतानाच भगवंताच्या पायापाशी पोहचवलं?'' 


शिष्याचे हे उत्तर ऐकून तथागत हसले व म्हणाले, ''तुम्ही कसोटीत उत्तीर्ण झालात.''









एक ऑफिसर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कारकुनाला अद्वातद्वा बोलला. त्या बोलण्यात शिव्यांचाही समावेश होता.

तरीही तो कारकून मात्र शांत उभा होता.

त्याच्यावर आपल्या बोलण्याचा काहीएक परिणाम होत नाही, असे पाहून तो अधिकारी आणखी चिडला. त्याचा राग एवढा नियंत्रणाबाहेर गेला की अक्षरश: तो त्या कारकुनाच्या अंगावर थुंंकला. तरीही तो कारकून शांतपणे समोर असलेल्या वॉश बेसिनकडे गेला व त्याने आपला चेहरा धुतला व तसाच पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला.

ते पाहून त्याचा अधिकारी शरमला. तो त्याच्या टेबलाजवळ आला व त्याला विचारू लागला, ''मी तुझ्याशी एवढं वाईट वागलो तरीही तू एक चकार काढला नाहीस हे कसे काय?''

तेव्हा तो कारकून म्हणाला, ''जे काम फक्त पाण्याने होऊ शकतं ते करण्यासाठी मी दगड का हातात घेऊ?''



Note: Stories are collected from internet pages and edited. Stories are published on the blog merely to inspire people. No copyright violation intended.

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !