काही कथा - ९





काही कथा - ९

नेटवर वाचलेल्या काही प्रेरणा देणारया , नितिकथा तुमच्यासाठी !








एक गणेशभक्त महात्मा होते. रोज मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करीत. 

एका शिष्याने त्याना पूजेसाठी सोन्याची गणेशमूर्ती बनवून आणली. ज्या भावनेने मातीच्या मूर्तीची पूजा करीत, त्याच भावनेने सोन्याच्या मूर्तीची पूजा करू लागले. 


दुसऱ्या शिष्याला वाटले, आपण गणपतीसाठी सोन्याचा उंदीर बनवावा. म्हणून त्याने गणपतीपेक्षा मोठा उंदीर बनवून आणला. 


पूजा चालूच राहिली. कालांतराने महात्मा वयोवृध्द झाले. त्यांना वाटले, आपल्या मृत्यूनंतर शिष्यांमध्ये मूर्तीवरून भांडण नको. त्यापेक्षा मूर्ती विकून मिळणारा पैसा इश्वरार्पण करून मुक्त होऊ. सोनाराकडे घेऊन गेले. गणपतीची मूर्ती दोन तोळे अन् उंदीर अकरा तोळे सोन्याचा ! 


सोनार गणेशमूर्तीपेक्षा उंदराच्या मूर्तीचे जास्त पैसे देऊ लागला. 


तेव्हा महात्मा आश्चर्याने म्हणाले, "अरे, गणपती तर देव आहे आणि उंदीर क्षुल्लक प्राणी. तरी तू देवाची किंमत कमी का देतोस ?" 


सोनाराने उत्तर दिले, " मी किंमत सोन्याची देतोय. देवाची किंवा उंदराची नाही."










जे जे सरकारी अधिकारी, मंत्री भेटले सिंगापूरमध्ये- ते सगळेच्या सगळे नियोजन आणि अंमलबजावणी याला पुण्यकर्मच मानतात. या भेटीत एक बडा सरकारी अधिकारी भेटला. त्याच दिवशी सकाळी तो भारतातनं परतला होता. मोदींच्या सिंगापूर भेटीची तयारी करण्यासाठी तो भारतात आला होता. 


त्याचा परतीचा प्रवास लांबला. त्याच्या गळ्यातल्या बॅगेवर इकॉनॉमी क्लासचा टॅग तसाच होता. 

मी म्हटलं, ‘तुमची बॅग तेवढी इकॉनॉमी क्लासनं आली का?’ 

तो म्हणाला, ‘नाही. मीच इकॉनॉमी क्लासने आलो.’ 

मला आश्चर्य वाटलं. त्याचा हुद्दा लक्षात घेता तो इकॉनॉमी क्लासमध्ये कसा, हा प्रश्न! त्याचं उत्तर त्यानंच दिलं. 

तो म्हणाला, ‘आमच्याकडे नियम आहे. विमानप्रवासाचा वेळ सहा तासांपेक्षा कमी असेल तर सर्वच जण इकॉनॉमी क्लासने जातात. अगदी लोकप्रतिनिधीसुद्धा. दिल्ली-सिंगापूर विमानप्रवासाचा वेळ पाच तास ४५ मिनिटं आहे. त्यामुळे इकॉनॉमी क्लास.’ 

मी म्हटलं, ‘१५ मिनिटांचा तर फरक..’ 

वाक्य पूर्ण व्हायच्या आत तो म्हणाला, ‘ही वेळ ५ तास ५९ मिनिटं असली तरी नियम तोच. आणि सगळ्यांनीच पाळायचा. विमान उशीराच आलं, वेळ लागणार आहे, या सबबी आम्ही देत नाही. आणि दिल्या तरी त्या ऐकल्या जात नाहीत.’ 

नंतर तो सांगत होता- एकदा तो दिल्ली-दुबई मार्गावर एअर इंडियानं प्रवास करत होता. तर त्या दिवशी कोणी मंत्री येणार म्हणून विमानाचं उड्डाण लांबवलं गेलं. त्याच्यासाठी फर्स्ट क्लासच्या अनेक केबिन्स रिकाम्या ठेवल्या गेल्या. आणि एवढं करून तो आलाच नाही. आणि तासाभराच्या विलंबानं त्या रिकाम्या सीट्स घेऊन विमान दुबईला निघालं. 


तो म्हणाला, ‘आम्हाला ही चन परवडत नाही. आम्ही काही तुमच्याइतके सधन नाही.’ 


- इति गिरीश कुबेर (लोकसत्ता दि. २२/११/२०१५)









आइन्स्टाइनचे सहकारी इन्फेल्ड यांनी आत्मचरित्रात म्हटलं आहे, की प्रिन्स्टनमध्ये असताना आइन्स्टाइनला त्याच्या गणिती आकडेमोडीतून एक महत्त्वाचा निष्कर्ष काढता आला. तो हा की गुरुत्वाकर्षणाच्या लहरी असू शकत नाहीत.

निष्कर्ष महत्त्वाचं असल्यानं त्यावर आइन्स्टाइननं सेमिनार द्यावं असं ठरलं व भाषणाची निनावी नोटीस निघाली. ‘निनावी’ याकरिता, की जर व्याख्याता म्हणून आइन्स्टाइनचं नाव नोटीसमध्ये आलं, तर व्याख्यानाला प्रसारमाध्यमं उगाच गर्दी करत असत. मात्र, व्याख्यानाच्या एक दिवस आधी आइन्स्टाइनला आपल्या गणितात चूक दिसली. ती दुरुस्त करता करता त्याचा मूळ निष्कर्ष बाद ठरला.


सेमिनार देताना आइन्स्टाइननं आपलं सगळं गणित मांडलं. त्यातली चूक दाखवली आणि ती दुरुस्त करताना मूळ निष्कर्ष कसा बाद ठरतो, हे सर्व प्रांजलपणे दाखवलं!



- जयंत नारळीकर  (सकाळ  दि. ६/१२/२०१५)